Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फडणवीसांचा गडचिरोली दौरा — जनसंपर्काला गती, १३ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांच्या विवाहासाठी साक्षीदार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर/ रवि मंडावार गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या सावटाखाली दडपलेली भूमी आता बदल घडवण्याच्या निर्णायक टप्प्यावर उभी आहे. एकेकाळी हत्यारं हातात घेणाऱ्या युवक-युवतींनी आता सातपाटलांवर हात घट्ट करत नवजीवनाची वाट धरली आहे. आणि या परिवर्तनाचा साक्षीदार ठरला तो म्हणजे गडचिरोली पोलिस दलामार्फत आयोजित करण्यात आलेला सामूहिक विवाह सोहळा, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहून शुभाशीर्वाद देण्यासाठी दाखल झाले.

या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात एकूण १३ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांनी विवाहबंधनात अडकून समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला. ‘पांडू आलाम’ सभागृहात पार पडलेल्या या विधीपूर्वक समारंभात मंगलाष्टकांच्या साक्षीने एक सामाजिक परिवर्तन घडताना दिसले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहभाग : केवळ पाहुणा नव्हे, बदलाचा भाग..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून नवदांपत्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला साक्ष दिली. त्यांनी प्रत्येक जोडप्याला गृहउपयोगी साहित्य व सन्मानचिन्ह बहाल केले आणि त्यांचे नवजीवन सुसंवाद, प्रेम व शांततेने बहरो, यासाठी शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यातील प्रशासकीय, राजकीय नेतृत्वाची ठसा उमटवणारी उपस्थिती..

या कार्यक्रमासाठी गडचिरोलीचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, अहेरीचे आमदार आ. धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह, उद्योगपती बी. प्रभाकरन, पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि पोलीस विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सगळ्या नेतृत्वाने या विवाह सोहळ्याला केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून नव्हे, तर शांती, विकास आणि समावेशी समाजनिर्मितीचा भाग म्हणून उचलून धरले.

फडणवीसांचा दौरा : विकास, विश्वास आणि वचनबद्धतेचा त्रिसूत्री प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा केवळ विवाह सोहळ्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि स्थानिक जनतेच्या अडचणी समजून घेतल्या. दुर्गम भागातही शासन पोहोचू शकते आणि माणसांपर्यंत संवादाच्या माध्यमातून विश्वासाचे बंध निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले.

पुनर्वसनाचं प्रतीक : समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणारा नवा वर्ग

एकेकाळी बंदूक हाती घेऊन जंगलात संघर्ष करणारे हे युवक-युवती आता नवजीवनाची सुरुवात करत आहेत. त्यांच्यासाठी विवाह हे केवळ एक सामाजिक बंधन नाही, तर शासनाच्या पुनर्वसन धोरणाचा मानवी चेहरा आहे.

या सोहळ्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या मनात आशावादाचे बीज पेरले गेले आहे. अशा उपक्रमांमुळे हिंसक प्रवृत्तींवर मात करून समाजाशी एकरूप होण्याचा मार्ग खुला होतो, हे स्पष्टपणे दिसून आले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.