Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धम्मदिनीच्या पवित्र पर्वावर ‘लुंबिनी धम्म संस्कार केंद्र, अहेरी’ येथे एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास व धम्मसंस्कार शिबिर संपन्न

ध्यान, प्रबोधन आणि धम्मदिशेच्या उजेडात तत्त्वशील जीवनाचं मंगल आरंभ...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि,१४: अहेरी तालुक्यात वसलेल्या लुंबिनी धम्म संस्कार केंद्र, गडअहेरी या पवित्र स्थळी दिनांक १३ जुलै रोजी, आषाढ महिन्याच्या धम्मदिनी, वर्षावासाच्या मंगलमय वातावरणात, एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास व धम्मसंस्कार शिबिर भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने संपन्न झाले.

धम्मपथावर चालण्याची उत्कट इच्छा बाळगणाऱ्या उपासक-उपासिका, विद्यार्थीवर्ग, तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत विविध स्तरांतील बौद्ध अनुयायांची शिबिरात उत्स्फूर्त सहभागाने उपस्थिती राहिली. सकाळी ११ वाजता भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्प, दीप, सुगंध वंदनाने प्रारंभ झालेल्या या शिबिरात त्रिशरण, पंचशील आणि धम्मपालन गाथांचा सामूहिक उच्चार करत एकात्मतेची अनुभूती घेण्यात आली.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिबिराच्या प्रारंभिक सत्रात आयुष्यमती शैलेजा गोरेकर यांनी आनापानसती, ध्यान व विपश्यना साधनेचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. “ध्यान ही केवळ शांततेची मुद्रा नसून ती जीवनशक्तीची दिशा आहे,” असे सांगत त्यांनी ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक विकारांवर मात करण्याचे तंत्र सहज आणि प्रभावी पद्धतीने मांडले. स्वतःच्या अनुभवातूनच त्यांनी ध्यानसाधनेने जीवनात आलेला स्वस्थतेचा, सकारात्मकतेचा आणि आत्मविश्वासाचा अनुभव शिबिरार्थींना सांगितला.

यानंतर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ धम्म प्रचारिका आयुष्यमती शिलाताई डोफे यांनी धम्मगुणांचे रसगर्भित विवेचन करत “भगवंताचे दहा विशेष गुण”, “वर्षावासातील पंचशील-अष्टशील आचरण”, “उपास व उपोसथ यातील भेद”, तसेच “उपोसथाच्या चार प्रकारांची व्याख्या” यांवर प्रगल्भ आणि अनुभवसमृद्ध प्रवचन केले. “उपासक हे केवळ व्रतधारी नसून समाजाच्या नैतिक रचनेचे शिल्पकार असतात,” असे सांगत त्यांनी उपासकांनी दहा शीलांचे पालन करत आदर्श व्यक्तिमत्व घडवावे, असा संदेश दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शक गोरेकर आणि शिलाताई डोफे यांचा सन्मान सन्माननीय इंदुताई वाळके या उपासकांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्व बौद्ध अनुयायांनी श्रद्धा, निष्ठा आणि करुणेच्या भावनेने शिबिराचा लाभ घेतला. यावेळी स्थानिक उपासक-विधायक समितीच्या कार्यकर्त्यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळत कार्यक्रम यशस्वी केला.

या शिबिराने केवळ एक दिवस नव्हे, तर अनेकांचे आयुष्य धम्माच्या उजेडात मार्गक्रमण करणाऱ्या दिशेने वळवले — हेच या आयोजकांचे खरे यश.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.