शिधापत्रीकाधारकांनी सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक*
गडचिरोली:शासनाच्या आदेशानुसार सर्व अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या सर्व शिधापत्रीकाधारकांनी आपल्या शिधापत्रीकेमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी विशेष मोहीम सुरु असुन, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई केवायसी न केल्यास, धान्य मिळणार नाही. यासाठी सर्व शिधापत्रीकाधारकांनी रास्तभाव दुकानात जावून ई केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे. तसेच नो नेटवर्क झोनमधील गावाकरीता, नेटवर्क असलेल्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजीत करुन ई-केवायसी करुन घेण्याबाबत तहसिलदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रास्तभाव दुकाने पुर्णवेळ सुरु ठेवावी. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिण्यातील १ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानात, लाभार्थ्यांकरीता धान्य उपलब्ध करुन देण्यात येते. प्रत्येक महिण्याच्या ७ तारखेला अन्नदिवस साजरा केला जातो, त्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी. तसंच ७ ते १५ तारखेपर्यंत अन्नसप्ताह साजरा केल्या जातो. त्यामुळे १५ तारखेपर्यंत रास्तभाव धान्य दुकानामधुन १०० टक्के लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्ययोजनेच्या गटातील शिधापत्रीकाधारकांना मोफत रेशनधान्य देण्यात येते, यासाठी सर्व लाभार्थ्यांची आधारशी निगडीत ई केवायसी रास्तभाव धान्य दुकानात होणे बंधनकारक आहे. “वन नेशन वन रेशन’ उपक्रमात देशभरात ज्या ठिकाणी लाभार्थी धान्य घेत आहेत. त्याच दुकानात त्यांची ई-केवायसी होणे अनिवार्य आहे गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या एकुण 223905 शिधापत्रीका असुन 841851 सदस्य आहेत. त्यापैकी 521715 सदस्यांची इ-केवायसी झाली आहे उर्वरीत 320136 शिधापत्रीकेतील सदस्यांची ई-केवायसी होणे बाकी आहे.
नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघठीत कामगारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीनुसार रेशन कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. ज्या कामगारांकडे अजुनही रेशनकार्ड नाही, त्यांनी तातडीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा त्यांना तातडीने रेशनकार्ड वितरीत करण्यात येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Comments are closed.