स्टील’च्या नावाखाली शेतीचा बळी? भेंडाळ्यात शासननिर्णयाची होळी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात भेंडाळा परिसरात प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांचा संताप आज उफाळून आला. शासनाने ११ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशाची प्रत जाळून आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
प्रस्तावित प्रकल्प हा JSW Steel कंपनीशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. ब्राम्हणवाडे यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने संपादित करून त्यांना भूमिहीन करण्याचा डाव आखला जात आहे. “हा विकास नसून संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
शेतकऱ्यांची संमती न घेता, ग्रामसभांना विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका करण्यात आली. भेंडाळा परिसरातील जमीन अत्यंत सुपीक असून अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेतीच आहे. अशा परिस्थितीत उद्योगाच्या नावाखाली शेतीचा बळी दिला जात असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शासनाने आदेश तत्काळ मागे घेतला नाही तर १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक मुंडन करून धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. “उद्योग हवा, पण शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्ततेच्या किंमतीवर नाही,” अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि संतप्त वातावरणात शासननिर्णयाची होळी करण्यात आली. भेंडाळ्यातील हा उद्रेक आता जिल्हाभरात मोठ्या आंदोलनाचे रूप धारण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

