Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थ्यांना मिळणार गावातच शिक्षण व पदवी प्राप्त करण्याची संधी-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

उश्राळमेंढा येथे विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 15 मे –  ‘विद्यापीठ आपल्या गावात’ हा उपक्रम वंचितांना शिक्षण देणारा महत्वाकांक्षी शिक्षण प्रकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत व रोजगाराभिमुख शिक्षण गावामध्येच मिळणार आहे. यामधील वन आणि बांबूवर आधारीत शिक्षण रोजगार निर्मीतीकडे घेवून जाणारे आहे. पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी गावातच चालून आली असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

ग्रामपंचायत उश्राळमेंढा (ता.नागभीड), गोविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय, तळोधी तथा आदर्श पदवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उश्राळमेंढा येथे ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य तथा आदर्श पदवी महाविद्यालयाच्या सल्लागार समिती सदस्या सौ. किरण संजय गजपुरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विवेक गोर्लावार, डॉ. ए. बी. रॉय, प्रा.अतुल कामडी, ग्रामसेवक योगेश्वर कापगते, विनोद सयाम, देवानंद डोर्लीकर, रवी लोंढे, प्रा. सुमित बोरकर आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले, बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीनुसार शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत रोजगाराभिमुख शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे हा या पदवी अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वी नंतर बी. ए. पदवीचे शिक्षण गावातच मिळणार आहे. तसेच या अभिनव उपक्रमामध्ये पुस्तकी शिक्षणाचा अतिरेक टाळून कौशल्य विकासावर भर देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत उश्राळमेंढा येथे वर्गखोलीचे उद्धाटन कुलगुरु डॉ. बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर, संचालन लुकेश देवगडे तर आभार सहसमन्वयक प्रवीण गिरडकर यांनी मानले. तत्पुर्वी, दिपप्रज्वलन, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उश्राळमेंढा गावातील विद्यार्थी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.