Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वच्छ भारत मिशनच्या कामात नियोजनाचा फज्जा- अजय कंकाडावार

अयोग्य बांधकामामुळे पावसाळ्यात नागरिकांचे जीवन विस्कळीत; माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची चौकशीची मागणी...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशनसारखी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी योजना गावोगावी राबवली जाते, ती गाव स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुजलाम् सुफलाम् व्हावं यासाठी. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतीने या योजनेच्या नावाखाली फुकट नगर भागात केलेल्या बांधकामाने लोकांना ‘स्वच्छते’ऐवजी ‘अडचणी’चा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण इतके गंभीर बनले आहे की, नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी आणि संबंधित बांधकाम हटवले जावे, अशी ठाम मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

फुकट नगरमधील नागरिकांनी थेट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सूचना दिल्यानंतरही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांच्या त्रासात भर पडत आहे. पावसाचे नैसर्गिक पाणी वाहून नेणारा मार्ग पूर्णपणे अडवून टाकल्याने गटारीतून पाणी वाहण्याऐवजी ते घरांच्या उंबरठ्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. यामुळे केवळ आरोग्य धोक्यात आले नसून, परिसरात डासांचे प्रमाण, घाणीचा त्रास आणि संसर्गजन्य आजारांची भीतीही वाढली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मुद्द्यावर स्वतः अजय कंकडालवार यांनी लक्ष घातले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे जनहित लक्षात घेऊन नियोजनबद्ध असायला हवीत. परंतु इथे तर नियोजनाच्या नावाखाली नागरिकांचे जगणे अस्वस्थ केले जात आहे. हे काम कुठे करायचे, कसे करायचे, याचा कोणताही शास्त्रीय विचार किंवा क्षेत्राची पाहणी न करता मनमानी पद्धतीने हे बांधकाम केले गेले, हेच यावरून दिसते.”

नागरिकांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही यंत्रणांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी लोकांमध्ये नाराजीचा सूर अधिकच तीव्र होत आहे. “शासकीय योजना आम्हाला हक्काचे वाटाव्यात, पण त्या जर आमच्या जिवावर बेतणाऱ्या ठरत असतील, तर आम्ही त्या योजनेचा स्वीकारच करू शकत नाही,” अशी भावना एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणात नागरिकांच्या मागण्यांना न्याय मिळावा आणि स्वच्छ भारत मिशनसारख्या योजनेच्या नावाखाली होणारी बेशिस्त व अनियोजित कामे रोखली जावीत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. आता आलापल्ली ग्रामपंचायतीतील जबाबदार अधिकारी या गंभीर तक्रारीकडे कसे उत्तर देतात आणि जिल्हा प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.

एकंदरीत, स्वच्छ भारताच्या नावाने ‘अस्वच्छ नियोजन’ नको! — अशी संतप्त मागणी फुकट नगरातून आता अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागली आहे. प्रशासनाने ही ओरड वेळीच ऐकली नाही, तर गावोगावी अशा योजनांवरील जनतेचा विश्वासच उडण्याचा धोका निर्माण होईल, याची जाणीव ठेवणे आवश्यक ठरते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.