Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बळजबरी प्रकल्पांविरोधात जनतेचा आवाज बुलंद होणार!

२६ जून रोजी गडचिरोलीत सर्वपक्षीय संघर्षाची दिशा ठरणार..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बळजबरी प्रकल्पांविरोधात आता निर्णायक संघर्षाची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक भूमिपुत्र, डावे-प्रगतिक पक्ष, सामाजिक संघटना आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत या लुटीच्या प्रकल्पांना रोखण्याचा निर्धार केला आहे. २६ जून रोजी गडचिरोली येथे सर्व पक्ष-संघटनांची संयुक्त बैठक होत असून, यानंतर जिल्हाभरात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भाई रामदास जराते यांनी सांगितले की, “विकासाला विरोध नाही, पण तो जनतेच्या विश्वासावर आणि अधिकारांच्या पायावर चालून जाणारा नको. एटापल्ली, कोरची तालुक्यातील लोह खाणींमुळे ग्रामसभांचे वनहक्क धोक्यात आले आहेत. जिंदाल स्टील, विमानतळ, कोनसरी-भेंडाळा एमआयडीसीसारखे प्रकल्प शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींचे बळकावणीकरण करत असून, या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थानिकांची भूमिका धुडकावली गेली आहे.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भविष्यात मोठ्या विस्थापनाचा धोका असून, हे थोपवायचे असेल तर वेगवेगळ्या लढ्यांना एकत्र आणणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांना थेट भिडणाऱ्या संघर्षाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२६ जून रोजी गडचिरोलीत होणाऱ्या बैठकीत ग्रामसभा प्रतिनिधी, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, बळजबरी प्रकल्पांविरोधात एकजुटीची भूमिका निश्चित केली जाणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या संवादावेळी माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे नेते धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, झेंडेपारचे प्रा. अनिल होळी, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, डाॅ. धर्मराज सोरदे (माकप), अतुल मडावी, धनराज दामले आदी प्रमुख उपस्थित होते.

“बळजबरी, विस्थापन आणि निसर्गहानीविरोधात जनता आता गप्प बसणार नाही. हा लढा एकत्रितच लढायचा,” असा निर्धार बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

Comments are closed.