Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ई-रिक्शा चालकांवर अन्याय थांबवण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; ऑटो रिक्षा संघटनेच्या दादागिरीविरोधात संतप्त प्रतिक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शहरात ई-रिक्शाद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास शासनाने मान्यता दिली असताना देखील काही ऑटो रिक्षा संघटनांच्या विरोधामुळे ई-रिक्शा चालकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी समर्थित ई-रिक्शा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी संघटनेकडून संबंधित घटकांवर कारवाईची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले.

पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. “ई-रिक्शा ही पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था असून शासनाच्या मान्यतेनेच चालक शहरात वाहतूक करत आहेत. मात्र काही ऑटो रिक्षा चालक त्यांच्या व्यवसायात अडथळा निर्माण करत आहेत, शिवाय दमदाटी आणि मारहाणीचे प्रकारही घडत आहेत,” असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, संबंधितांवर कारवाई करावी आणि ई-रिक्शा चालकांना कोणताही अडथळा न येता शहरभर प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते जी. के. बारसिंगे, कवडू दुधे, संदीप सहारे, विजय दुर्गे, वसिम शेख, मोतीराम महाजन, दीपक सोरते आदींसह ई-रिक्शा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.