Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत विश्व शांतिदिन उत्साहात साजरा, शांतीचा संकल्प गावोगावी नेण्याची प्रतिज्ञा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेल्या विश्व शांतिदिनानिमित्त गडचिरोलीत रविवारी (२१ सप्टेंबर) सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत इंदिरा गांधी चौकावरील सभामंचावर एक अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि गंभीर वातावरणात शांती संदेशाचा सोहळा पार पडला. एकता सामाजिक शिक्षण संस्था व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात केवळ औपचारिकता नव्हे, तर मानवी मूल्ये, सहिष्णुता आणि परस्पर सुसंवादाचा संदेश देणारे विचार प्रवाह दुमदुमले.

अध्यक्षीय नेतृत्व आणि प्रमुख उपस्थिती…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंचाचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय संयोजक, विश्व शांतिदूत प्रकाश आर. अर्जुनवार यांनी भूषवले. गांधी-आंबेडकर विचार प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक, वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विदर्भ सहसंयोजक चंद्रशेखर भडांगे, गडचिरोली जिल्हा संयोजक गोवर्धन चौहान, गांधी–बिरसा मुंडा विचार प्रकोष्ठ महाराष्ट्र संयोजक वसंतराव कुलसंगे, निवृत्त पोलीस निरीक्षक व जिल्हा संयोजक संघरक्षक फुलझले, जिल्हा व्यापार प्रकोष्ठाचे त्रिलोकी शर्मा तसेच जिल्हा शिवसेना प्रमुख ठाकूर पोरेड्डीवार या मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून शांतीचा संदेश अधोरेखित केला.

शांती ही सामूहिक जबाबदारी – प्रकाश अर्जुनवार…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकाश अर्जुनवार यांनी जगभरातील वाढत्या युद्धवृत्तीवर तीव्र चिंता व्यक्त केली. युद्धाची क्रूरता आणि अमानवीयता माणुसकीला चिरडत आहे. शांती ही केवळ सरकारांची किंवा संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. गावागावांत, शाळा-महाविद्यालयांत सर्वधर्म शांती समित्या स्थापन करून परस्पर सामंजस्य वाढवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, व्यसनमुक्त आणि अहिंसक समाज उभारणे, हीच खरी गांधी-विचारसरणी आहे, असे ते म्हणाले.

युद्धविरोधी ठाम संदेश…

मुख्य अतिथी रोहिदास राऊत व चंद्रशेखर भडांगे यांनीही संयुक्त राष्ट्राचा शांतीदिन हा केवळ एक प्रतीक नाही, तर मानवी अस्तित्वाच्या रक्षणाचा जागतिक इशारा आहे. जगातील अनेक देश युद्धाच्या सावटाखाली आहेत; ही वृत्ती मानवतेस घातक आहे आणि तिचा ठाम विरोध आवश्यक आहे, असे मत नोंदवले.

प्रतीकात्मक श्रद्धांजली आणि संकल्प…

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेस सूतमाळ अर्पण करून मानवतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बापूंना अभिवादन करण्यात आले. प्रकाश अर्जुनवार यांनी गडचिरोली जिल्ह्यासह राज्य, देश आणि विदेशातही बुद्ध, महावीर, पैगंबर मोहम्मद, ईसा मसीह, गुरु नानक, बिरसा मुंडा आणि महात्मा गांधी यांच्या नैतिक मूल्यांचा प्रसार करून शांतीचा संदेश घराघरात पोहोचविणे हेच पुढील कार्य असेल,अशी शपथ सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांना देऊन संकल्पबद्ध केले.

सुव्यवस्थित आयोजन..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ प्रचारक संजय बारापात्रे यांनी केले. मंच संचालन संघटन कार्यालय सचिव सुनील गोंगले यांनी केले, तर युवा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक मंगेश रणदिवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

गडचिरोलीचा शांतीसंदेश..

जिल्हा नेहमीच विकास व संघर्ष यांचा संगम राहिला असला तरी, शांततेच्या पायावर उभ्या होणाऱ्या प्रगत गडचिरोलीचा संकल्प या कार्यक्रमातून उलगडला. मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांमुळे गावागावांत शांती समित्या उभारण्याचा निर्धार व्यक्त झाला.

या प्रसंगी नागरिकांनी जागतिक युद्धवृत्ती, धार्मिक उन्माद आणि सामाजिक विषमता यांना नाकारत अहिंसा, परस्पर सौहार्द व पर्यावरण संरक्षणाचा मार्ग स्वीकारण्याची एकमुखी शपथ घेतली. गडचिरोलीच्या मातीतून उमटलेला हा शांतीसंदेश केवळ जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण देश आणि जगासाठी एक प्रेरणादायी दिशा ठरेल, अशी भावना उपस्थितांच्या मनात दाटून आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.