‘प्रधानमंत्री आवास योजने’त 20 लाख नवीन घरं मंजूर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
पुणे : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजने’तंर्गत देशातील तसंच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्कं घर उपलब्ध करून दिलं जाईल. तसंच केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री आवास योजने’तंर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना मंजुरी देण्यात आली.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था अर्थात अटारी, शिवाजीनगर येथे किसान सन्मान दिवसानिमित्तानं शेतकरी तसंच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आदी उपस्थित होते.
राज्यातील गरीब, गरजूंना घरं मिळणार : “2011 च्या जनगणनेवेळी सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेनुसार यापूर्वी ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा लाभ दिला जात होता. त्यात त्रुटी असल्यानं केंद्र शासनानं नव्यानं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून ‘आवास प्लस योजनें’तर्गत महाराष्ट्रातील अतिरिक्त 26 लाख कुटुंबांना घरकुलांचा लाभ होणार आहे. देशात एकाच वर्षात मोठ्या प्रमाणावर घरं राज्यातील गरीब, गरजूंना मिळणार,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी म्हणाले की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोणताही गरीब घरापासून वंचित राहणार नाही, प्रत्येकाला पक्कं घर मिळालं पाहिजे, असा संकल्प केला आहे. हा संकल्प आमचं सरकार लवकरच पूर्ण करणार. याचाच एक भाग म्हणून, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस’ अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 6 लाख 37 हजार 89 पक्की घरं देण्यात येत आहेत. आता पुन्हा नव्यानं 13 लाख 29 हजार 678 पक्की घरं देण्यात येतील. सर्व मिळून एकूण 19 लाख 66 हजार 767 घरं देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
Comments are closed.