Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एअर इंडियाचा मोठा निर्णय; 24 ते 30 एप्रिलदरम्यान भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा रद्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 22 एप्रिल :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत जगभरात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, ही लाट आटोक्यात आणण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. भारतातही सध्या कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत असून, अनेक राज्यांमध्ये संचारबंदी, कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं ब्रिटननं आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत नवीन निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियानं 24 ते 30 एप्रिल दरम्यानची ब्रिटनला जाणारी आणि येणारी आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. कंपनीनं बुधवारी याबाबत माहिती दिली.

या वेळी आठवड्यातून एकदा ब्रिटनसाठी विमान फेरी चालवण्याचा कंपनी विचार करत असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाबतीतली ताजी माहिती वेबसाइट आणि सोशल मीडियावर उपलब्ध होईल, असंही कंपनीनं कळवलं आहे. एअर इंडियानं 24 ते 30 एप्रिल दरम्यानची भारत आणि ब्रिटन यांच्यामधील सर्व विमान उड्डाणे रद्द केली असून नवीन वेळापत्रक आणि परताव्यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एअर इंडिया 24 ते 30 एप्रिल दरम्यान दिल्ली आणि मुंबईहून ब्रिटनला आठवड्यातून एकदा उड्डाण करण्याची तयारी करत आहे. याबाबतची अधिक माहिती वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.