मैदानी खेळ हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली – आमदार डॉ. मिलिंद नरोटे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आजच्या धावपळीच्या, ताणतणावपूर्ण आणि बदलत्या जीवनशैलीत शरीरासोबत मनही सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. क्रिकेटसारखे खेळ केवळ करमणूक नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि संघभावना निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, असे परखड प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
अप्पर–डिप्पर ग्रुपच्या वतीने आयोजित अप्पर–डिप्पर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील शिवाजी महाविद्यालयालगत असलेल्या स्व. गंगुवार मैदानावर शनिवार, २४ जानेवारी रोजी या बहुप्रतिक्षित स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, अबूझमाड शिक्षण मंडळाचे सचिव समशेर खान पठाण, पोलीस दक्षता पथकाचे डीवायएसपी सुनील महाडीक, प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे, सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी, सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. यशवंत दुर्गे, आयफार्मचे संचालक राजेश इटनकर, नगरसेवक सागर निंबोरकर, रवि मेश्राम, प्रमोद पिपरे, निखिल मंडलवार, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, माजी नगरसेवक अविनाश वरगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
अप्पर–डिप्पर ग्रुपतर्फे दरवर्षी सातत्याने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी पर्यावरणाशी निगडित संकल्पनांवर संघांची नावे देण्यात येत होती. यंदा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करत संघांची नावे ठेवण्यात आली आहेत.
सिंहगड लायन्स (मालक – निखिल मंडलवार), प्रतापगड पँथर्स (मालक – अनुराग पिपरे), शिवनेरी वॉरियर्स (मालक – बलराम सोमनानी) आणि रामगड रॉयल्स (मालक – डॉ. यशवंत दुर्गे) हे चार संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
उद्घाटनानंतर मैदानावर खेळाडूंचा जोश, कर्णधारांचा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहता ही स्पर्धा चुरशीची ठरणार, हे स्पष्ट दिसून आले. ही स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून विजेत्या संघाला आकर्षक चषकासह रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
मान्यवरांनी अप्पर–डिप्पर ग्रुपच्या सामाजिक, क्रीडा आणि युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. अशा स्पर्धांमधून शहरात सकारात्मक ऊर्जा, आरोग्याची जाणीव आणि संघभावना निर्माण होते, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे अध्यक्ष रूपराज वाकोडे यांनी केली. सूत्रसंचालन शिक्षक रमन गागापुरवार यांनी तर उपस्थितांचे आभार नितेश खडसे यांनी मानले.

