भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात परिवर्तनाचा झंझावात; ‘जुने समीकरण’ मोडून नव्या नेतृत्वाकडे जनतेचा कल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
समीर बामुगडे
रोहा प्रतिनिधी : भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत राहिलेली नसून ती जनतेच्या मनातील साचलेल्या असंतोषाचा आणि परिवर्तनाच्या तीव्र इच्छेचा उद्रेक ठरताना दिसत आहे. अनेक वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही स्थानिक विकासाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जुन्या नेतृत्वाविषयी गावागावात प्रखर नाराजी निर्माण झाली असून आता मतदार नव्या, स्वच्छ आणि निर्भय नेतृत्वाच्या शोधात असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. “गावाचा विकास म्हणजेच शहराचा विकास” ही नव्याने आकार घेत असलेली संकल्पना आता या गटातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भुवनेश्वर गटातील सामाजिक आणि राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे बदलाच्या लाटेत वाहताना दिसत आहे. दीर्घकाळ आश्वासनांच्या राजकारणात अडकून पडलेल्या जनतेने यंदा प्रश्न विचारण्याचा निर्धार केल्याचे चित्र आहे. सदेश मोरे, सचिन मोरे, संतोष खेरेटकर आणि विशेषतः दीप वायडेकर या तरुण नेतृत्वाला गावागावातून मिळणारा वाढता प्रतिसाद हे या बदलत्या राजकीय वास्तवाचे प्रतीक मानले जात आहे. ग्रामसभा, स्थानिक बैठका, चौकातील चर्चासत्रे आणि सोशल मीडियावरील संवादातून या तरुणांनी उभा केलेला मुद्देसूद आवाज आता जनतेच्या मनात घर करताना दिसत आहे. भ्रष्टाचार, सरकारी जमिनींचे कथित गैरव्यवहार आणि प्रशासनाशी असलेल्या संगनमताच्या आरोपांवर त्यांनी थेट भूमिका घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाकडे मतदार आशेने पाहत असल्याचे वातावरण आहे.
याउलट, मागील अनेक वर्षांत जुन्या नेतृत्वाने तरुण पिढीच्या अपेक्षांकडे केवळ आश्वासनांच्या पोकळ घोषणांपुरतेच लक्ष दिल्याची टीका सातत्याने पुढे येत आहे. रोजगार निर्मिती, कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक उद्योगांची उभारणी आणि शाश्वत विकासाच्या योजनांचा अभाव यामुळे अनेक तरुणांचे करिअर आणि भविष्य अनिश्चिततेत ढकलले गेल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. राजकीय स्वार्थासाठी तरुणांचा वापर झाल्याचा आरोपही उघडपणे मांडला जात असून यंदाच्या निवडणुकीत या नाराजीचे रूपांतर निर्णायक मतदानात होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

भुवनेश्वरमध्ये निर्माण झालेले वातावरण हे व्यक्तीविरोधी नसून व्यवस्थाविरोधी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भीती न बाळगता प्रशासनाला प्रश्न विचारणारे, स्थानिक समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणारे आणि सत्ता ही जनसेवेचे माध्यम असल्याची भूमिका मांडणारे नवे नेतृत्व मतदारांच्या पसंतीस उतरत आहे. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी उघडपणे उभे राहत असल्याचे चित्र दिसत असून राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवारांबाबतही सकारात्मक चर्चा सुरू झाली असून पारंपरिक पक्षीय राजकारणाला पर्याय म्हणून स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि स्थानिक प्रश्नांशी बांधिलकी असलेले नेतृत्व पुढे यावे, अशी जनतेची अपेक्षा बळावत आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय जाणीवा लक्षात घेता मतदार आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वालाच संधी देण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
एकंदरीत, भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक ही पारंपरिक राजकीय पद्धतीला दिलेले आव्हान ठरत असून मतदारांच्या अपेक्षांमध्ये झालेला हा बदल भविष्यातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो. जुने नेतृत्व नाकारून नव्या, लढाऊ आणि पारदर्शक नेतृत्वाला जनता निर्णायक कौल देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आता स्पष्टपणे उमटत आहेत.
हे देखील वाचा ,
जंगल वाचवायचं की खिसे भरायचे? अल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह- शंकर ढोलगे


Comments are closed.