Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. ११ एप्रिल :- “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांधतेसारख्या अनिष्ठ चाली-रितींविरुद्ध विचारांचा लढा पुकारला. बहुजनांच्या दु:खाचं, दारिद्र्याचं, मानसिक गुलामगिरीचं मूळ ‘अविद्ये’त असल्याचं सांगत त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात त्यांनी केली.

देशाला पुढे नेणारा, देशात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवणारा सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महात्मा ज्योतीबा फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्य व विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.