शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.07:कृषि विभागांतर्गत राज्य शासनाने विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक शेतीमाल थेट विक्री करण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. याचाच भाग म्हणून गडचिरोली कृषि विभागाकडून जिल्हयात सुरु केलेल्या केंद्राच्या शुभारंभ आज जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांना बांधावर मिळणारी कमी दर व वेळेवर विक्री न होणे या प्रश्नांवर यामुळे तोडगा निघणार आहे. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विकल्यामुळे अधिकचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच ग्राहकांनाही स्वस्त दरात शेतमाल खरेदी करण्यास मिळणार आहे. कृषि विद्यापीठाच्या समोर व कृषि विज्ञान केंद्रालगत, चंद्रपूर रोड वरती शेतमालाचे हे विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. शुभारंभ प्रसंगी प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा समन्वयक कृषि विज्ञान केंद्र संदिप कऱ्हाळे, कृषि अधिकारी श्री. कदम, कुरखेडा कृषी मंडल अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
गडचिरोली मधील ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून आलेल्या शेतमालाची खरेदी स्वस्त दरांमध्ये करावी असे आवाहन यावेळी कृषी अधिक्षक यांनी केले. कुरखेडा तालुक्यामधून आलेल्या चांगला प्रतीच्या कलिंगडाची विक्री शुभारंभ प्रसंगी मोठया प्रमाणात झाली. तसेच याठिकाणी शेतामधील इतरही भाजीपाला विक्रीस ठेवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांनी केली खरेदी:- शुभारंभ कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची खरेदी केली. तसेच उपलब्ध भाजीपाला व त्याबाबत विक्री प्रक्रिया याबाबत माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांकडून आणलेल्या कलिंगडाची चवही त्यांनी यावेळी घेतली. ते यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी जे विकेल, ग्राहकांना आवडेल ते देण्याचा प्रयत्न करायला हवा. चांगल्या प्रतीची फळे व भाजीपाला नेहमीच ग्राहकाची पसंती असते.
Comments are closed.