Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध - सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
ॲड. आशिष जयस्वाल पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील लोह प्रकल्पाला चालना मिळेल. भविष्यातला ‘स्टील हब’ ही नवी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना रेल्वे, विमान, आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवून आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य सेवेतही जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच दिशेने सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला प्रगत आणि उन्नत बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून भविष्यात गडचिरोली राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी परेडचे निरीक्षण केले तसेच परेड संचलनाची मानवंदना स्विकारली. त्याच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलिस दलाच्या श्वान पथकाने आकर्षक प्रात्याक्षिक सादर केले तसेच सांस्कृतिम कार्यक्रमात सरस्वती विद्यालय, विद्याविहार कॉन्व्हेंट, नवजीवन पब्लिक स्कुल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी ॲकेडमी यांनी देखील समुहनृत्य सदर केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.