वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी; करबडा गावातील महिलेला जीव गमवावा लागला..
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. मागील तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आज सकाळी आणखी एक जीव गेला. चिमूर तालुक्यातील करबडा गावालगत तेंदूपत्ता तोडत असलेल्या महिलेला वाघाने चिरडल्याची घटना घडली असून, तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव अरुणा भरडे असे असून, त्या तेंडूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील या भागात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. अरुणा भरडे यांचा मृतदेह झाडाझुडपात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
तत्पूर्वी तीन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांत वाघाच्या हल्ल्यात पाच नागरिकांचे प्राण गेले आहेत. या घटनांनी जंगलालगतच्या गावांत भीतीचे गडद सावट पसरले आहे. शेतकरी, तेंदूपत्ता संकलक आणि मोहाफळ गोळा करणारे लोक दररोज जीव मुठीत धरून जंगलात जात आहेत.
वन विभागावर संतापाचा सूर
घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असली, तरी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. “प्रत्येक हंगामात हीच पुनरावृत्ती होते. केवळ मृत्यू झाल्यानंतर वन विभाग हलतो,” असा आरोप ग्रामस्थांनी केला.
पिंजरे बसवून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, तोपर्यंत गावकरी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठोस उपाययोजनांची गरज..
वाघांचे पुनर्वसन, बफर झोनमधील हालचालींवर नियंत्रण, स्थानिक नागरिकांना पर्यायी रोजगार तसेच तातडीच्या सल्लागार समित्यांची स्थापना अशा ठोस उपाययोजना शासनाने हाती घ्याव्यात, अशी मागणी चिमूर तालुक्यातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
Comments are closed.