Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. त्यातच आज पुण्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबई आणि महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्रातील निर्बंधावर भाष्य करु शकतात. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या टास्क फोर्सच्या बैठकीत दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन नसेल, पण निर्बंध कडक लावले जातील, असं ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली आहे. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही पण प्रवाशांच्या विभाजनाचा विचार सुरु असल्याचं सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

टास्क फोर्सची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व विभागांचे मुख्य सचिव, कोविड १९ संसर्ग टास्क फोर्सचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लॉकडाऊन, निर्बंध याबाबत मोठा निर्णय अपेक्षित आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.