Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

खरे गुन्हेगार शोधण्यासाठी SIT नेमण्याची संघर्ष समितीची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाडा, 24 नोव्हेंबर :-  वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळेतील इयत्ता ९ वी मधे शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने दि. 20 ऑक्टोबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. हे प्रकरण आश्रमशाळा व्यवस्थापनाने दडपले होते. मात्र या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही पदाधिकाऱ्यांसह राजकीय लोकांचाही सहभाग आहे, अशी माहिती मिळताच मुलीचे वडील शंकर यशवंत मालक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांच्या चौकशीत गौरी मालकचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची माहिती मिळताच दि.२१ नोव्हेंबर रोजी परळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल गंगाधर विरगावकर, (वय – ५७) यांच्यावर अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा तालुक्यातील परळी या गावामध्ये माजी खासदार पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेमध्ये कु. गौरी शंकर मालक रा. वडवली, पो. गारगांव, ता. वाडा ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. तिच्याकडे मोबाईल मिळाला म्हणून तिला संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांकडून व मुख्याध्यापकांकडून सतत त्रास दिला जात होता. तिला वारंवार मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलवून घेतले जात होते. तिच्यावर आरोप करुन तिला काही चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त केले जात असावे, त्यामुळे तिने कंटाळून विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना होती. वाडा तालुक्यातील गारगांव आश्रमशाळेतील सानिया सुनिल पराड या १० वी तील विद्यार्थिनीनेही अशाच प्रकारे जून महिन्यात आत्महत्या केली होती. अवघ्या ५ महिन्यात आश्रमशाळेतील २ मुलींच्या आत्महत्या झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली. आदिवासी विकास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर तपासाला वेग आला व वाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गौरी मालक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र SIT नेमावी. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये गेल्या दहा वर्षात १३६ विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मृत्यू झाले आहेत. गेल्या ४ महिन्यात दि. १/६/२०२२ ते दि. २०/१०/२०२२ पर्यंत १२ विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या सर्व मृत्यूची SIT मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी विकास संघर्ष समितीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर गुन्हा मुख्याध्यापकावर झाला असला तरी खरे गुन्हेगार जो पर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत लढा सुरुच राहील, अशी माहिती शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

गोंडवाना विद्यापीठात साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमाच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्ष

Comments are closed.