Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम असावी’, राज्यातील ४० विचारवंत कलावंतांचे, मुख्यमंत्री आणि शरद पवारांना पत्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली दि. ०३ नोव्हें: राज्यातील जवळपास ४० विचारवंत साहित्यिक कलावंतांनी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी कायम ठेवण्यासाठी पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. “गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी बांधवांच्या व परिवाराच्या दृष्टीकोनातून (स्त्रियांच्या) हिताची आहे. या दारुबंदीला आदिवासी गावांमधील ग्रामसभा आणि स्त्रियांच्या चळवळीचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे तेथील दारु कमी झाली आहे. मात्र, अशावेळी ही बंदी उठवण्यासाठी समितीकडून होणारा विचार थांबवावा आणि तेथील दारूबंदी अधिक प्रभावी करावी,” अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, राज्यपाल आणि शरद पवार यांना आवाहन करणार्‍या साहित्यिक-विचारवंतांमध्ये अनिल अवचट, सतीश आळेकर, मिलिंद बोकील, रामदास भटकळ व प्रमोद मुनघाटे, कलावंत अमोल पालेकर, संध्या गोखले आणि सत्यपाल महाराज, वैज्ञानिक-प्रशासक अनिल काकोडकर, विवेक सावंत, संपादक सदा डुंबरे, विनोद शिरसाट आणि पराग चोळकर, डॉक्टर्स आनंद नाडकर्णी, शेखर भोजराज व विनय बर्‍हाळे, सामाजिक कार्यकर्ते उल्का महाजन, विवेक पंडित, विश्वंभर चौधरी, मोहन हि. हि., बायफचे गिरीश सोहनी, ‘अनिस’चे अविनाश पाटील व नवल ठाकरे, यवतमाळचे महेश पवार, वनराईचे गिरीश गांधी, मेधा कुलकर्णी, मेळघाटचे डॉ. सातव, पौर्णीमा उपाध्याय, बंड्या साने, कोल्हापूरच्या नसीमा हुजरूक, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दिल्लीहून खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी नेते देवाजी तोफा व हिरामण वरखेडे, तसेच डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांचा समावेश आहे. तर राळेगणसिध्दीहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना ५ जाहीर प्रश्न

१. आ. विजय वडेट्टीवारांना दारुमुक्ती संघटनेचा पहिला प्रश्न

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“आपण म्हणता की गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी अयशस्वी झाली, बेकायदेशीर दारु प्रचंड वाढली, विषारी दारु पिऊन खूप माणसे मरत आहेत. तसे जर खरेच झाले असेल तर ही जबाबदारी कुणाची? ‘दारुबंदी’ हा शासकीय कायदा आहे, १९९२ मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असताना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. त्याच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी शासनाची, म्हणजे पर्यायाने मंत्री म्हणून तुमची आहे. दारुबंदी अयशस्वी झाल्याची जी वर्णनं तुम्ही करता ती जर खरी असतील, तर ते मंत्री म्हणून तुमच्याच अपयशाचे वर्णन आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दोन उपप्रश्न उपस्थित होतात.”

“चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि आता-आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय दारुबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? जर शासकीय निर्णय तुम्हाला नीट अंमलबजावणी करता येत नसेल तर तुम्ही स्वत:ला ‘अपयशी मंत्री’ घोषित कराल का? दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी?”

. आ. विजय वडेट्टीवारांना दारुमुक्ती संघटनेचा दुसरा प्रश्न

“तुम्ही राज्याचे आपत्ति-सहायता मंत्री आहात. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाची प्रचंड मोठी आपत्ती आली आहे. गावो-गावी हजारो माणसे आजारी पडत आहेत. या भयंकर आपत्तीच्या निवारणाऐवजी तुम्हाला अचानक दारुबंदी हीच सर्वात मोठी आपत्ती का वाटते? कोरोना निवारणाऐवजी दारुबंदी उठवण्यातच तुम्हाला एवढा रस का आहे? यात कोणते रहस्य लपले आहे?

३. आ. विजय वडेट्टीवारांना दारुमुक्ती संघटनेचा तिसरा प्रश्न

‘दारुबंदीची अंमलबजावणी अयशस्वी झाली’ हे दारुबंदी उठवण्याचे समर्थन होऊ शकते का? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे जाळे पसरले आहे. हे टीव्हीवर रोज जाहीर होते आहे. महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी कठोर कायदा आहेत. तसे असूनही मुंबईत ड्रग्ज वाढले आहेत. तर त्याच न्यायाने ‘ड्रग्ज बंदी अपयशी झाली, तिला उठवा’ अशी मागणी तुम्ही केव्हा करणार आहात?

४. आ. विजय वडेट्टीवारांना दारुमुक्ती संघटनेचा चौथा प्रश्न

देशात आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचार विरोधी आणि बलात्कार विरोधी कायदे आहेत. तरी दिल्लीत ‘निर्भयाकांड’ झाले. उत्तरप्रदेशमध्ये हाथरस-कांड झाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्याविरुध्द सत्याग्रह करत आहेत. काँग्रेस पक्ष जागोजागी निदर्शने करतो आहे. आमच्या दृष्टीने बलात्काराचा निषेध झाला पाहिजे. पण दारुबंदी अयशस्वी झाली म्हणून तिला उठवा या ‘वडेट्टीवार न्याया’ने ‘बलात्कार बंदी उठवा’ अशी मागणी कराल का? बंदी असूनही देशात बलात्कार रोज घडतात. तर मग बलात्कार पूर्णपणे थांबवता येत नसतील तर बलात्कार कायदेशीर कराल का? आणि तोच न्याय लावून अपुरी अंमलबजावणी असलेली प्लास्टिकबंदी, भ्रष्ट्राचारबंदी हे सर्व केव्हा उठवणार? हे करणार नसाल तर मग फक्त दारुबंदी का उठवा?

५. आ. विजय वडेट्टीवारांना दारुमुक्ती संघटनेचा पाचवा प्रश्न

“राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आर. आर. पाटील यांना गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर झाला. त्यामुळे जागे होऊन राज्यात गुटखा-बंदी आणि सर्व प्रकारची सुगंधित तंबाखूबंदी लागू आहे. ती योग्यच आहे. पण तरी महाराष्ट्रात सर्वत्र रस्त्यांवर, चौकांमध्ये पानठेल्यांवर खुले आम खर्रा, मावा, सुगंधित तंबाखू विकली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सर्वेक्षणानुसार अवैध दारुपेक्षा पाच पट अधिक अवैध तंबाखू विकली जात आहे. पुरुष, स्त्रिया, मुले खात आहेत. सुगंधित तंबाखूबंदीची अंमलबजावणी पूर्णत: अयशस्वी दिसते. गुटखा-खर्रा-सुगंधित तंबाखूबंदी उठविण्यासाठी समिती स्थापन का करत नाही? मंत्री महोदय, केवळ दारुच पुन्हा सुरु करण्यात तुम्हाला एवढा रस का?”

राज्यातील ४० विचारवंत कलावंतांचे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळपास ४० प्रमुख विचारवंत साहित्यिकांनी प्रश्न निर्माण करून लक्ष वेधले आहे.

Comments are closed.