मुंबईकरांना गुड न्यूज, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 29 जानेवारी:– मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राज्य सरकारने येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलने प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेताना प्रवाशांना वेळेचं बंधन घालून दिलं आहे. सकाळी 7 च्या अगोदर प्रवास करण्यास परवानगी, नंतर 7 ते 12 प्रवासाला बंदी, परत 12 ते 4 प्रवास करण्यास मुभा आणि 4 ते 9 प्रवासास बंदी, असे जाचक नियम सरकारने ठेवले आहेत.
1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल.
प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या लोकांना किंवा सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सध्या सुरु केलल्या लोकलचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.
Comments are closed.