शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरीत समाजसेवेचा संदेश; रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी फळवाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी उपविभागात समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह मूक-बधिर एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. तसेच केक कापून वाढदिवस साजरा करत समाजसेवा आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

राजकीय कार्यक्रमांपेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. त्यांना फळांचे वाटप करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मूक-बधिर एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षण, सामाजिक जबाबदारी, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
अहेरीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल भागात समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, तसेच राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असू शकते, हा संदेश उपस्थितांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रम अहेरी विधानसभा प्रमुख दिलीप सुरपाम यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमात महेश मोहुर्ले (युवा सेना जिल्हाप्रमुख),प्रफुल येरणे, मोनू सलामे, प्रणित श्रीरामवार (मनसे अहेरी तालुका अध्यक्ष), सुदामा हलदार (मनसे अहेरी तालुका सचिव), अमोल रामटेके (मनसे अहेरी शहराध्यक्ष), मिंटू सैय्यद, विकी गुप्ता, सोनू भाऊ वाकूलकर (मनसे जिल्हा उपाध्यक्ष), सोनू चीलंनकर (शिवसैनिक) यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची सदिच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त सेवा, सहकार्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या अशा उपक्रमांची गरज विशेषतः गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यांत अधिक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता समाजाभिमुख कार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला हे विशेष..

