लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली, दि. १९ मे : भारतीय क्रिकेटपटू तसेच पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३४ वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सिद्धू यांची शिक्षा वाढवावी यासाठी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूची शिक्षा कमी करून १००० रुपयांच्या दंडावर मुक्तता केली होती.
पंजाब हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूला या आरोपांतून मुक्त केले होते, तसेच मारहाण प्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
काय आहे प्रकरण :
- २७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून १.५ किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते.
- त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
- त्याच दिवशी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला. वर्ष १९९९ मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला.
- वर्ष २००२ मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. वर्ष २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
- उच्च न्यायालयाने डिसेंबर २००६ मध्ये निकाल सुनावला. यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूच्यावतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सन २००७ मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.
हे देखील वाचा :
हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना ही एकात्मता दिसणार का ?
Comments are closed.