आलापल्लीत महावितरण कर्मचाऱ्यांचा ७२ तासाच्या संपाला सुरुवात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
आलापल्ली, दि. ४ जानेवारी : वीज वितरण कंपनी मर्यादित आलापल्ली विभागीय कार्यालासमोर विद्युत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री १२ च्या ठोक्यापासून ७२ तासाच्या संपाला सुरुवात केली आहे. हा संप आजपासून ४ जानेवारी ते ६ जानेवारी पर्यंत राहणार आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही संपूर्ण महाराष्ट्राला विज वितरण करते. राज्य सरकारच्या सुचनाप्रमाणे महावितरणांचं काम चालत. पण आता या महावितरणाचं खासगीकरणं केल्या जाणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मुंबईतील काही भागात अदाणी पावर खासगी विजवितरकांमार्फत वीज पुरवल्या जाते आता त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात अदाणीचं विज पुरवतील. म्हणजे वीज वितरक महावितरणचं असेल पण महावितरणाचे खासगीकरण केल्या जाईल. तरी महावितरणाच्या खासगीकरणास महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. किंबहुना सरकारकडे या विषयी मागणी केली आहे. पण सरकारने आवश्यक तो निर्णय न घेतल्याने आज महावितरण कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात संप पुकारला आहे.
आलापल्ली विभागीय कार्यालयासमोर आलापल्ली विभागातील कर्मचाऱ्यांचे संपाचे नेतृत्व प्रदीप सडमेक, एन. एस.थगवेल, आनंद कुत्तरमारे, कुणाल नांदेकर, मोहन सोनटक्के, प्रल्हाद वैरागडे, गौतम सोरते, सचिन भोयर, दीपक थापा, रोशन कन्नाके, देवानंद गेडाम, बंडू मोहूर्ले, अरुण डहाळे, पी. एन. गेडाम, बी. एफ. गोंडाळे, कैलाश दोडके, विजय पाचभाई, दिनेश पिंपळकर, साईनाथ आरके, रणजित दास, टी. जे. गलबले, संजय कोठरकर, मनोज भिमटे, अनिकेत ओलालवार इत्यादी कर्मचारी करीत आहेत.
विद्युत कर्मचाऱ्यांचे प्रमुख मागण्या
- महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा.
- महावितरण मध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका.
- कंत्राटी, आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा.
- तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा.
- एम्पनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा.
- महावितरण मधील २०१९ नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रांमध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा.
तरी आजपासून ३ दिवस म्हणजे ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान संप असणार आहे. तरी कर्मचारी कामावर नसल्याने आलापल्ली विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध भागात वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता देखभाल तसेच दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.