Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर साधू हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले तरी ठाकरे सरकारकडून न्याय नाही – प्रविण दरेकरांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १६ एप्रिल पालघर साधू हत्याकांडानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी न्याय मिळू शकला नाही. हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ ‘सत्ते’ साठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दरेकर माध्यमांशी बोलत होते.
सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. हिंदुत्वाच्या आचार-विचारांची कास धरत हिंदुत्वाचे तेजस्वी रूप हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते, त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं व सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरकारचा निषेध करताना दरेकर म्हणाले की, या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज मी, आचार्य तुषार भोसले यांच्यासह विधानभवना जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केलं, या प्रकरणाची सरकारला आठवण करून देण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. एव्हढेच नाही तर आम्ही दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधु-महंतांना श्रद्धांजली देखील देणार आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून जनता सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करीत आहे, आता तरी सरकारने जागं व्हावं, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

राज्यात साधु, संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा, महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, जोपर्यंत या हत्याकांडातील दोषींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला जाब विचारत राहु, असंही दरेकर यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.