गडचिरोलीत पावसाने केला कहर…
आलापल्ली-खमनचेरु या प्रमुख मार्गांवरील संपर्क तुटला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ९ जुलै : अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे.
यामुळे ताडगाव-भामरागड, मुलचेरा-आष्टी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-सिरोंचा वाहतूक बंद झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे.
मुलचेरा तालुक्यात आज पहाटे पाच वाजतापासून मुसळधार पाऊस पडत कोपरअली गावानजीकच्या दिना नदीला पूर आला आहे.
यामुळे मुलचेरा -आष्टी मार्ग बंद आहे. काही गावांतील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे वनविभागाचे हत्ती कॅम्प आहे. तेथे अनेक पर्यटक हत्ती पाहण्यासाठी जातात. परंतु कमलापूर-रेपनपल्ली मार्गावरील नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद आहे.
चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने आष्टी-आलापल्ली मार्ग बंद आहे. मेडाराम आणि बामणी नाल्याच्या पुरामुळे आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच तानबोडी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने खमनचेरु आलापल्ली मार्गही बंद आहे. कुमरगुडा नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने ताडगाव-भामरागड मार्ग कालपासून बंद आहे. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक १४१.४ -असल्याने मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात ११७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Comments are closed.