जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे तर्फे श्रीमती कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली व जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील सोनापूर जिल्हा कांम्प्लेक्स स्थीत कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधाना बाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सागर म्हशाखेत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी मा रमेश ऊचे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब कांबळे, संविधान विश्लेषक अनंत भवरे तर पाहुणे म्हणून आसाराम गायकवाड सुरज वाळके अरुण शिंदे दीपक लोखंडे व महा अंनिस जिल्हागडचिरोली शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, जिल्हा निधी व्यवस्थापक गोविंदराव ब्राम्हणवाडे, शाळेच्या पर्यवेक्षिका स्मीताताई लडके, जिल्हा महिला प्रतिनिधी सुधाताई चौधरी, काशिनाथ देवगडे, आदी उपस्थित होते. अनंत भवरे यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जरी आपण संविधान स्वत:प्रत अर्पण करीत आहोत असे म्हटले असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वत:ला अर्पणच केलेलो नाही कारण या संविधानात काय सांगितले आहे याची जाणीव जागृती समाजातील प्रत्येक घटकाला करून देणे ही शासनाची जबाबदारी होती पण त्यांनी ती पार पाडली नाही म्हणून या संसदेत कित्येक अपराधी लोकांनी जागा बडकावली आहे आणि सामान्य नागरिकांनी देखील फुकटात वाटप करणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊन पुन्हा येणाऱ्या पाच वर्षांत आणखी कोणाकडून फुकटात जास्त मिळू शकते याचीच आतुरतेने वाट पाहणारे मतदार आपण उघड्या डोळ्याने पाहतो आहोत.
पण कोणीही चारित्र्यवान कर्तव्यदक्ष उमेदवार निवडून द्या म्हणण्यासाठी कार्य करताना सामाजिक कार्यकर्ते दिसून येत नाहीत. जे काही करतात त्यांची संख्या फारच अल्प प्रमाणात असल्याने लोक देखील अशांचीच टिंगलटवाळी करतांना दिसतात. महापुरुषांनी जीवाचे रान करून व रक्ताचे पाणी करून बहूजन समाजातील वंचित, गावकुसाबाहेर राहीलेला समाज संविधानातील तरतूदी नुसार स्वाभिमानाने ताट उभा राहून इतरांच्या बरोबरीने जगला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून आपल्याला संविधान सुपुर्द केले पण आपल्या निष्काळजीपणामुळे काही दिवसातच या संविधानाला मुकावे लागणार आहे. म्हणून जे जे संविधानाचे लाभार्थी आहेत निदान त्या लोकांनी तरी संविधानाचे महत्व ओळखून त्याच्या बचावासाठी प्रयत्नरत राहीले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
दादासाहेब कांबळे यांनी संविधान रॅली मागील भुमिका विषद केली व बत्तीस जिल्ह्याचा दौरा करतांना समाजातून मिळालेले अनुभव कथन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सागर म्हशाखेत्री यांनी संविधानातील अनुच्छेदाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व उचित लाभ मिळवून दिला त्याबद्दल मान्यवरांचे अभिनंदन केले. मा ऊचे साहेब यांनी देखील संविधानातील काही अनुच्छेदामुळेच आज विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण सरकारला देणे भाग पडले आहे. संविधानामध्ये सर्वच स्तरातील बालकांना मोफत शिक्षण व हाताला काम देण्याची तरतूद केलेली आहे पण त्यासाठी आपल्याला जागरूक राहता आले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मा विलास निंबोरकर राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प यांनी केले. सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक दिगांबर पिलेवान यांनी तर आभारप्रदर्शन स्मीताताई लडके यांनी केले.
हे देखील वाचा :-
https://loksparsh.com/maharashtra/gadchiroli-nature-safari-open-for-tourists/33681/
Comments are closed.