केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी. लिट. पदवी प्रदान व 25 वा दीक्षांत समारंभ.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नांदेड 24 फेब्रुवारी :-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट (डी. लिट.) पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस आभासी पद्धतीने उपस्थित होते. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 25 दीक्षांत समारंभ ही संपन्न झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे विध्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्ञान , तंत्रज्ञान आणि कौशल्य याचे महत्व अधोरेखित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की नांदेड हे ऐतिहासिक शहर असून श्री गुरू गोबिंदसिंघजीची पवित्र भूमी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालीच मराठवाडा मुक्ति संग्रामाचा लढा लढला गेला त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
विद्यापीठ हे ज्ञानाचे केंद्र आहे. ज्ञान आणि कौशल्यामुळे विकासाला चालना मिळते. ज्ञानाच्या या प्रकाशाने अंधार संपुष्टात येतो. ज्ञान आणि सत्तेबरोबरच शालीनता आणि नम्रता ही तेवढीच महत्वाची आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहा हजार कोटीचे काम केवळ 680 कोटीत तर 12 हजार कोटींचा टनेल 6 हजार कोटीत झाला ही सर्व तंत्रज्ञानाची कमाल आहे. देशात नॅशनल पॉवर ग्रीड आहे मग नॅशनल वॉटर ग्रीड का नाही होऊ शकत असा प्रश्न उपस्थित करून नदीचे समुद्रात जाणारे पाणी जर शेतीकडे वळवले तर किती फायदा होईल, शेतकरी समृद्ध होईल. आता गावे सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे, अन्नदाता सुखी झाला पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे आणि त्यासाठी विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार संशोधन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे, नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारे बनले पाहिजे, पुस्तकी ज्ञानाबरोबच प्रत्यक्ष प्रयोगशील ज्ञान मिळणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. समाजातील दुर्लक्षित आणि शोषित घटकाला केंद्रबिंदू समजून त्याच्या उत्थानासाठी ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. आपल्या ज्ञान आणि संशोधनाचा मानवतेच्या निकषावर मानवाची उन्नती होण्यासाठी उपयोग झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे डॉ अनिल काकोडकर – राष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उच्च शिक्षणाच्या संदर्भात भारतासारख्या देशात मानव सक्षमीकरणाच्या दृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ काकोडकर यांनी दुरदृश्य पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की संशोधनाच्या कक्षा रुंदावने, नवीन तंत्रज्ञान निर्मितीस पोषक वातावरण निर्माण करणे, जागतिक दर्जाच्या सेवा आणि सुविधा देशांतर्गत निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रात उच्च दर्जाचे व्यावसायिक तज्ञ निर्माण करणे आणि समाजातील विषमता दूर करण्याच्या दृष्टीने तळागाळातील मंडळींची विविध क्षेत्रात क्षमता उंचावणे. प्रचलित मूल्यवृद्धी व सेवांच्या संधीबरोबरच नवीन ज्ञानकेंद्रित तंत्रज्ञानाचा या साठी उपयोग होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
हे पण वाचा :-
Comments are closed.