Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

IND vs ENG : भारतीय फिरकी गोलंदाजानी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले, पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व!

इंग्लंडची पहिली इनिंग 205 रन वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना भारतानं दिवसअखेर शुभमन गिलची  विकेट गमावून 24 रन केले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, 4 मार्च : आर. अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीनं चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्येही इंग्लंडवर (IND vs ENG) वर्चस्व गाजवलं आहे. या जोडीच्या भेदक बॉलिंगमुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर झालेली तिसरी टेस्ट दुसऱ्याच दिवशी संपली होती.  चौथ्या टेस्टमध्ये अनुकूल पिच असूनही इंग्लंडला संपूर्ण दिवस बॅटींग करता आली नाही. इंग्लंडची पहिली इनिंग 205 रन वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना भारतानं दिवसअखेर शुभमन गिलची  विकेट गमावून 24 रन केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला.  या निर्णयाचा फायदा इंग्लंडच्या बॅट्समनला घेता आला नाही. अक्षर पटेलनं इंग्लंडला दोन झटपट धक्के दिले. अक्षरची ही पहिलीच टेस्ट सीरिज आहे. त्यानं यापूर्वीच्या दोन टेस्टमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) देखील फक्त 5 रनवर आऊट झाला. त्याला मोहम्मद सिराजनं आऊट केलं. जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यानं सिराजचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिराजनं जो रुटची मोठी  विकेट घेत टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला.

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) या मॅचमध्ये एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. या खेळीच्या दरम्यान त्याचा कॅप्टन विराट कोहलीशी वाद देखील झाला. या वादानंतरही स्टोक्सनं निर्धारानं खेळत अर्धशतक झळकावलं. वॉशिंग्टन सुंदरनं त्याला 55 रनवर आऊट केलं. टी ब्रेक पर्यंत इंग्लंडची निम्मी टीम आऊट झाली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

टी ब्रेक पर्यंत मॅचमध्ये एकही विकेट न घेऊ शकणाऱ्या आर. अश्विननं इंग्लंडला धक्का दिला. अश्विननं  तीन विकेट्स झटपट घेतल्या. तर अक्षर पटेलनंही दोन विकेट्स  घेत इंग्लंडची पहिली इनिंग संपुष्टात आणली. अक्षरच भारताचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं चार विकेट्स घेतल्या. अश्विननं 3, सिराजनं 2 तर सुंदरनं 1 विकेट घेतली..

पहिल्या दिवशीच बॅटींगला आलेल्या भारतीय टीमची सुरुवात देखील खराब झाली. इंग्लंडचा अनुभवी बॉलर जेम्स अँडरसननं शुभमन गिललं पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केलं. गिलला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्या टेस्टमधील अर्धशतकानंतर गिल सातत्यानं या मालिकेत अपयशी ठरला आहे.

गिल आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीनं सावध खेळ करत आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसअखेर भारतानं 1 आऊट 24 रन केले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Comments are closed.