तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम
राज्य सरकारने हा पथदर्शी उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबवल्यास जातीच्या दाखल्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघेल...- विवेक पंडित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क दि, ४ ऑगस्ट : पालघर येथील तलासरी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले देण्याचा ‘माझा दाखला माझी ओळख’ हा पथदर्शी उपक्रम राबवला जात आहे. आदिवासी विद्यार्थाना जातीचा दाखला उपलब्ध होत नसल्याने त्यांना प्रवेश, शिष्यवृत्ती, शैक्षणिक आरक्षण तसेच भविष्यात आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजननांचा लाभ घेता येता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी आश्विनी मांजे, तहसिलदार स्वाती घोंगडे आणि गटविकास राहुल म्हात्रे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांद्वारे तलासरिमधील जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील दाखले नसलेल्या एकूण ८५६२ विद्यार्थ्यांपैकी ६५८३ विद्यार्थींचे दाखले तयार झाले आहे. आज राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांच्या हस्ते तलासरी तालुक्यातील जि.प. शाळा कवाडा येथे जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
राज्यात जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी कार्यक्रम तलासरी तालुक्यात राबविण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच इतर योजनांच्या लाभासाठी जातीचे दाखले वेळेवर मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. यातून तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी ‘माझा दाखला माझी ओळख‘. ही शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले देण्याची पथदर्शी संकल्पना मांडली, आणि या संकल्पनेला तलासरीच्या उपविभागीय अधिकारी आश्विनी मांजे आणि तहसिलदार स्वाती घोंगडे यांनी मूर्त रूप देण्यास मेहनत घेतली. तसेच या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, व इतर कागदपत्र जमा करणे याबाबत मोलाची भूमिका पार पाडली.
यासाठी त्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दाखल्यांचे परिपूर्ण अर्ज सादर कारण्यासंबंधित प्रशिक्षण देण्यात आले व सेतू कार्यालयातील कर्मचारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी दिली.
लॉक डाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा विशेष कार्यक्रम राबवल्यामुळे आजच्या कार्यक्रमात श्री विवेक पंडीत यांनी उपविभागीय अधिकारी श्रीम. आश्विनी मांजे, तहसिलदार स्वाती घोंगडे , गटविकास राहुल म्हात्रे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.
अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा भाग म्हणून जातीचे दाखले विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जाऊन दिले पाहिजेत याचा पथदर्शी कार्यक्रम तलासरी मध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत राबवला आहे. यामुळे जातीच्या दाखला नसल्यामुळे आदिवासी मुलं शिक्षणापासून, शिष्यवृत्तीपासून किंवा इतर योजनांपासून वंचित राहतात ते यामुळे वंचित राहणार नाहीत.
त्यामुळे या “दाखला देण्याच्या मोहिमेत आदिवासी विकास विभागाने पुढाकार घ्यावा आणि यासाठी लागणाऱ्या निधीची आणि इतर गोष्टींची व्यवस्था करावी” असे आवाहन यानिमित्ताने विवेक पंडित यांनी आदिवासी विकास विभागाला केले आहे. तसेच “असा कार्यक्रम राज्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात राबविला जावा” अशी मागणी विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यानिमित्ताने केली आहे.
हे देखील वाचा,
मोठी बातमी… MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,
Comments are closed.