Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….

  • टीम इंडियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीला आज १० वर्षे पूर्ण
  • आज बरोबर दहा वर्षापूर्वी भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला होता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पोर्ट डेस्क, दि. २ एप्रिल: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष असं महत्व आहे. दहा वर्षापूर्वी, आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा, तब्बल २८ वर्षानंतर आपलं नाव कोरलं होतं. त्या आधी १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता. त्याची पुनुरावृत्ती करत २ एप्रिल २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इतिहास रचला. 

विशेष म्हणजे यजमान देशाने आपल्याच देशात प्रथमच विश्वचषक जिंकला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघाला श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने प्रथम गोलंदाजीला आमंत्रित केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात माहेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर लंकेने ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. वानखेडे स्टेडीयमवर ह्या धावा नक्कीच त्यावेळी एक कठीण लक्ष होत.

परंतु सेहवाग आणि सचिनसारखे दिग्गज खेळाडू मैदानात परतले असताना आपण वेगळेच खेळाडू असल्याचं गंभीरने दाखवुन दिलं. टिच्चून फलंदाजी करताना त्याने १२२ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. त्याला २३ वर्षीय विराट कोहलीने ४९ चेंडूत ३५ धावा काढत चांगली साथ दिली. त्यानंतर मैदानात आलेल्या जय-विरू अर्थात माही-युवी जोडीने कोणतीही पडझड होवू न देता संघाला विजय मिळवून दिला. त्यात धोनीने ७९ चेंडूत नाबाद ९१ तर युवराजने २४ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या.

भारतीय संघ १० चेंडू आणि ६ विकेट राखून जिंकला. सामना धोनीने षटकार खेचत आपल्या नेहमीच्या स्टाईलने संपवला होता. त्यालाच या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर या संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या युवराजला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

भारतीय संघाला तब्बल २८ वर्षांनी एवढ्या मोठ्या यशाची चव चाखायला मिळाली होती. त्यामुळे तो विजय, ते मैदान आणि तो षटकार भारतीय चाहते कधीही विसरणार नाही.

Comments are closed.