वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट समोर!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. २५ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहेत तर दुसरीकडे नागरिक प्रदूषणाने अधिकच त्रस्त असताना आता नवे संकट समोर आले आहे. सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी परिसरात वाहणा-या शिरना नदीला कोळसा खाणीतील मातीच्या ढिगार्यांचा धोका निर्माण झालाय. कोळसा थर काढण्यासाठी खोदलेली माती (ओव्हर बर्डन) थेट नदीच्या काठावर टाकल्याने नदीकाठ पंधरा ते वीस फूट उंच उंचावला आहे. एकीकडे ४०० फूट उंच मातीचे ढिगारे असल्याने त्याच्या भूगर्भीय दाबाने काल रात्री अचानक हा प्रकार झाल्याचे स्थानिकांचे मत आहे.
या प्रकाराने परिसरातील खेड्यांमध्ये घबराट पसरली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या नागलोन-2 खुल्या कोळसा खाणीतून निघालेली माती नदीच्या काठावर नियमबाह्यरित्या टाकल्याने भूभाग उंचावल्याचा स्थानिकांचा दावा आहे. विशेष म्हणजे ही नागलोन खाण आधी भूमिगत कोळसा खाण प्रकारातली होती. गेल्या काही वर्षात अधिक उत्पादनासाठी ती खुल्या स्वरूपात परिवर्तित केली गेली. भूमिगत खाणीमुळे आसपासचा संपूर्ण भूभाग पोकळ झाला आहे.
यामुळेच शिरना नदीचे पात्र एका बाजूने भूकंपग्रस्त झाल्यागतची स्थिती उदभवली आहे. नदीचे पात्र दुभंगले गेल्याने धोकादायक भौगोलिक स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या परिसरातील २० गावाना पुराचा धोका निर्माण झालाय. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी पुढे येत आहे.
हे देखील वाचा :
“वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Comments are closed.