Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

लेखक : डॉ.जे.के.फर्नांडिस व डॉ.ओ.म.गुळवणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आपल्यापैकी प्रत्येकानेच बुरशीला बघितले आहे.

बुरशी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नेमकी कुठे येते?
कशी असते?
ती येण्याचे कारण काय आहे?
ती येऊ नये यासाठी काय केले पाहिजे?
याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

ओलसर आणि दमट वातावरण असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थांवरती बुरशीची अत्यंत वेगाने वाढ होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

म्हणजेच…

ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही आणि हवेचा वावर मुक्तपणे होण्यास अडथळा असतो अशा ठिकाणीच बुरशी झटपट वाढते.

याचा अर्थ असा आहे का की जिथे सूर्यप्रकाश आणि खेळणार वारं नसतं त्याठिकाणी बुरशी येतंच नाही.

होय, मित्रांनो!

ज्या ठिकाणी मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असते त्याठिकाणी बुरशीला वाढण्यास फार कमी वाव असतो.

उदाहरणार्थ :

गरम चपात्या केल्यावर…

त्यातली एक चपाती गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात घालून ठेवून दिली आणि एक चपाती उघड्यावरच जिथे खेळती हवा भरपूर सूर्यप्रकाश पोहोचतोय अशा ठिकाणी ठेवली अन् तीन दिवसानंतर दोन्ही पोळ्यांचे निरीक्षण केले तर…

हवाबंद डब्यातील चपाती बुरशीने व्यापलेली सापडेल तर त्याउलट उघड्यावर ठेवलेली चपाती वाळून कडक झालेली असेल. त्यावर धूळ जमा झालेली दिसेल. पण बुरशी नसेल.

गृहिणींना हा अनुभव बरेचदा मिळतो.

असं का झालं असेल, मित्रांनो?

तर या मागे आहे विज्ञान. खेळती हवा आणि सूर्यप्रकाशामुळे बुरशीची वाढ होण्यास अटकाव होतो.

आजकाल आपण सर्वांनी म्युकरमायकोसीस अर्थात काळ्या बुरशीच्या आजारबद्दल खूपदा ऐकले असेल.

बरोबर. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या काही लोकांना हा आजार आपल्या कवेत घेतो आणि खूप मोठ्या काळजीत टाकतो.

तुम्हाला प्रश्न पडला असेल चपातीवर येणाऱ्या बुरशीचा आणि आपल्याला होणाऱ्या या आजाराचा काय संबंध?

तर मग तुम्हाला बरोबर प्रश्न पडलेला आहे याबद्दल खात्री बाळगा.

पुन्हा एकदा सांगतो…

बुरशीचा आजार ओलसर आणि दमट ठिकाणी, बंद ठिकाणी चटकन निर्माण होतो, पसरतो, वाढतो.

ज्या ठिकाणी मुक्त खेळती हवा नाही, सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बुरशीची वाढ झटपट होते.

जर तुम्ही बातम्या बारकाईने वाचल्या ऐकल्या तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की लोकांना बुरशीचा संसर्ग नाकातील पोकळीमध्ये आणि घशात झालेला असतो, ज्यामुळे अनेकांचे डोळे खराब होतात, टाळूला छिद्र पडते, इत्यादी इत्यादी…

कारण काय?

तर तुमची इम्युनिटी खूप कमी झालेली आहे.

कशामुळे?

कोरोनावरच्या औषधोपचारामुळे?

बरोबर आहे…

पण याशिवाय खालील कारणेही अत्यंत महत्त्वाची आहेत :

१) मास्क नियमितपणे न बदलणे…

२) दिवसातील चोवीस तास मास्क तोंडावर बांधून ठेवल्यामुळे…

३) सूर्यप्रकाशात न बसल्यामुळे…

४) नाकाच्या मार्गाची, घशाची नियमितपणे स्वच्छता न केल्यामुळे…

बुरशीला वाढ होण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण मिळते आणि मग अशी इम्युनिटी कमी असलेली व्यक्ती या आजाराला सहज बळी पडते.

अरे, मग करायला काय हवं? कोरोनावर औषधोपचार तर करणं गरजेचं आहे ना?

होय मंडळी, नक्कीच कोरोनासाठी औषधोपचार घेतलाच पाहिजे..

परंतू जरा नियमही पाळा.

१) आपण वापरत असलेले मास्क वेळच्या वेळी स्वच्छ करा.

२) जर तुम्ही एकांतात असाल तर मास्क घालून न बसता मोकळी हवा येईल, खूप सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बसा.

३) सर्दीने नाक चोंदलेले असते ते वेळच्या वेळेस स्वच्छ करा. गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा आणि तोंड निर्जंतुक करत राहा.

४) जलनेती : जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली जलनेती करून आपल्या नासिका मार्गाची अत्यंत कुशलतापूर्वक सफाई करा.

सगळ्याच गोष्टींना डॉक्टरांना जबाबदार धरणे सोडून द्या.

औषधोपचारमुळे तुमची इम्युनिटी कमी झाली आहे म्हणून औषधोपचारांवरतीही घसरू नका.

लक्षात ठेवा आपली जबाबदारी आपणच उचलायला हवी!

आत्ता सांगितलेल्या चार गोष्टींचे जर पालन केलात तर काळी बुरशी नावाचा आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाही. असो…

जर तुमचे आप्तेष्ट, नातेवाईक ज्यांना करोना झालेला आहे किंवा जे त्या आजारातून बाहेर पडत आहेत त्या सगळ्यांना या गोष्टी कंपल्सरी पाळायला लावा.

आपले जिवलग आपल्याजवळ राहावेत असे वाटत असेल तर त्यांची काळजी घेणे, त्यांना स्वतःला त्यांची काळजी घ्यायला लावणे ही आपली जबाबदारी आहे.

रुग्ण कितीही आळस करत असेल…
कंटाळा करत असेल…
त्याला त्या गोष्टीची शिसारी असेल…
चीड असेल…

तरीही त्याला प्रयत्नपूर्वक, प्रेमाने ह्या गोष्टी करायला लावणे गरजेचे आहे.

बाकी आपली मर्जी…

पैशाचा माज जीव वाचवण्यासाठी नेहमीच उपयोगी पडत नाही.

तसेच…

डॉक्टरही औषध उपलब्ध नसेल तर इच्छा असून सुद्धा तुम्हाला काडीचीही मदत करू शकत नाही.

ही गोष्ट गांभीर्याने समजून घ्या.

आणि म्हणूनच…

नैसर्गिकरित्या पथ्यपाणी, नियमित स्वच्छता, सूर्यप्रकाश आणि आवश्यक व्यायाम याचा वापर करून स्वतःला तंदुरुस्त ठेवा.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो.

त्यामुळे मास्कचा अतिरेकही टाळायला शिका.

जर तुम्ही गर्दीसोबत नाहीत, इतरांच्या सोबत नाही आहात, मोकळ्या वातावरणात किंवा आपल्याच घरी एकांतात असाल. तर मास्कला शंभर टक्के बाजूला ठेवा आणि मोकळा श्वास घ्या.

या सगळ्या गोष्टी तुम्हाला बुरशीजन्य आजारापासून दूर ठेवतील. आणि हो, मोकळा श्वास घेतला तर तुमची ऑक्सिजन लेव्हलही खूप झटपट वाढेल.

Comments are closed.