राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला सुद्धा गंभीर धक्का बसला आहे. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाने ९ जानेवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक केली असून या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून पराभूत उमेदवार आणि जिल्हास्तरीय नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक येत्या 9 जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. पक्षांतर्गत नाराजी, उमेदवारीच्या वाटपावर झालेल्या तक्रारी आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या पक्षात, गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे. पराभूत उमेदवार आणि उमेदवारीला डावललेले नेते आपली नाराजी व्यक्त करू शकतात. तसेच, पक्षाचे भविष्यातील धोरण आणि महाविकास आघाडीसोबतच्या सहकार्याबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागांवर लढत ८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पवार गटाने ८६ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीतील या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट लक्षात न घेता तिकीट वाटप केल्याचा आरोप पक्षातील काही सदस्यांनी केला आहे.
हे ही वाचा,
‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;
स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर
Comments are closed.