धारावीतील अनधिकृत बांधकामाना पालिकेचे संरक्षण.
धारावीतील अनधिकृत बांधकामाना कोणतेही संरक्षण नाही : आमदार प्रा. वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 16, सप्टेंबर :- धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. या धारावीत महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या एका भूखंडावर गेल्या काही वर्षांत २५० ते ३०० अवैध बांधकामे उभारण्यात आली आहेत. ही बांधकामे एक कोटी ते पाच कोटींपर्यंत विकली जातात. या बांधकामांना लोकप्रतिनिधी, पोलिस, पालिकेचे अधिकारी संरक्षण देत असल्याचा दावा करणारी तक्रार तक्रारकर्त्याने मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांकडे केली आहे
बांधकामांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आपण विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करत आहोत. मात्र कुणीही याची दखल घेत नाही. ही बांधकामे अवैध असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. ती पाडण्यासाठी पालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयाने शेकडो वेळा नोटिसा देण्याचा फक्त सोपस्कार पार पाडला असून, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नाही. १५ नोव्हेंबर, २०१९ रोजी सहाय्यक आयुक्तांच्या दालनात माझ्या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यावेळी मालमत्ता विभाग आणि देखभाल विभागातर्फे सर्वेक्षण सुरू असून, बेकायदेशीर बांधकामांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, अशी माहिती खान यांनी दिली.
दरम्यान धारावीच्या आमदार व माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता आपण या बांधकामांना कधीही संरक्षण दिलेले नाही. वैध बांधकामे कायम ठेवून अवैध बांधकामांवर पालिकेने नियमानुसार कारवाई करावी, अशी आपली स्वच्छ भूमिका असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अधिकृत झोपडीधारकांकडून नुकसान भरपाई व हस्तांतर शुल्क वसूल करण्याच्या आपल्या प्रचलित नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आपण धारावी प्रकल्प अधिकारी व पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हे देखील वाचा :-
प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना
Comments are closed.