गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. २१ ऑगस्ट : पावसाळ्यामध्ये ग्रामिण भागातील रस्ते वापरण्या योग्य राहत नाहीत अशा गाव पाड्यात पक्के रस्ते तयार करुन हे रस्ते मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनावणे, सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयुषी सिंह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. दुर्गम भागातील ग्रामस्थामध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी आशा सेविका घरोघरी जाऊन आरोग्याविषयी माहिती देणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील समस्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करणाच्या सुचना दिल्या असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ या उपक्रमामध्ये गाव, पाड्यातील प्रत्येक घरात ५५ लिटर शुध्द पाणी मिळण्यासाठी पाणी शुध्दीकरण प्रकल्प स्थापन करण्यात येईल असेही डॉ. गावित यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली
Comments are closed.