Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…! – शरद पवार यांचे आवाहन

"कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही", परिवहन मंत्री ॲड.परब यांचे आश्वासन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १० जानेवारीगेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटीसारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागत आहे. त्‍यामुळे संस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आपण व आपल्या संस्थेच्या भविष्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ताताडीने कामावर रूजू व्हावे, असे आवाहन देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेंसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

तर आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतुक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे स्पष्ट आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळ संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. या संपाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी कॉग्रेंसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सोमवारी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी बोलताना कृती सामितीने संपकरी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कारवाई बाबत एसटी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत मांडले. तसेच एसटीचे दैवत असलेल्या जनतेची अतोनात हाल टाळण्यासाठी तातडीने एसटी सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, गेली दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर संपामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवासी जनतेचे अपरिमित हाल होत आहेत. गेली ७० वर्षांपेक्षा अधिककाळ सर्वसामान्यांची एसटी कष्टकरी एसटी कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. एसटी ही प्रवाशांच्या हितासाठी आहे. प्रवाशांच्या हिताची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्याला एसटी देखील अपवाद नाही. तरीदेखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अंत्यत धाडसी असून त्याबद्दल त्यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारीत वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संपकरी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कारवायासंदर्भात बोलताना मंत्री ॲड.परब म्हणाले, निलंबन, बडतर्फ आणि सेवासमाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रूजू झाल्यास सदर नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही प्रमादीय कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. तसेच या बाबतचे परिपत्रकही काढण्याचे निर्देशही त्यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले. तसेच याबरोबरच बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतुक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे प्रति़पादन करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड.परब यांनी केले.

हे देखील वाचा : 

पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन..

कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

माध्यमांचे एकांगीकडे वाटचाल!

Comments are closed.